Saturday 2 September 2017

गुणवत्तापूर्ण शिक्षण

ज्ञानरचनावादाची किमया न्यारी प्रत्येक पंखात बळ भरी.

आज शिक्षणक्षेत्रात ज्ञानरचनावाद हा शब्द आता परवलीचा बनला आहे.खरेतर राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकट २००५ याचा हा पाया असून RTE-२००९ (बालकाचा मोफत व सक्तीचा हक्क) यातील कलम २९ मध्येही या ज्ञानरचनावादाची तत्वे अंतर्भूत आहेत.त्यामुळे ज्ञानरचनावाद  समजून घेणं  ही आता आपल्यासाठी अत्यंत निकडीची बाब आहे.
आज- आपण ज्या पाच E {five E’s} बाबत बोलतो तीच तत्वे रचनावादात प्रामुख्याने वापरली जातात.सर्वसाधारणपणे मनुष्य स्वत शिकत असतो,स्वताच्या ज्ञानाची स्वत: रचना करतो.स्थानिक परिस्थितीचा ,शिवाय सामाजिक,भाषिक व सांस्कृतिक  आंतरक्रियेद्वारे ज्ञानाची निर्मिती होत असते.याच तत्वांवर ज्ञानरचनावाद अवलंबून आहे.
                 
बालकाला ज्या अनुभवातून ,नवीन ज्ञान प्राप्त   व्हावयाचे  ते  नेमके कशाप्रकारचे  आहेत यालाही महत्व आहे. यातील  अध्ययनानुभव ,विषयाला सुसंगत आणि समर्पक असावे ही जबाबदारी शिक्षकाची आहे. उदा पहिली ते पाचवीकरीता अक्षरपट्ट्या ,शब्दपट्ट्या ,वाक्यपट्ट्या,छोटी चित्ररूप पुस्तके,शाळेत उपलब्ध असलेली वाचनकार्डे ज्ञानरचनावादी साहित्य म्हणून वापरता येतील.भाषा,गणित व इंग्रजी विषयासाठी प्रत्येकी  किमान  2000 ते 3000 कार्डसंचय असणं अपेक्षित आहे.ज्यामध्ये  प्रामुख्याने आजुबाजूच्या परिसरातील वस्तू व इतर चित्रांचा समासर्वांना दिसेल अशी मांडणी असावी .हे पाहून विद्यार्थी प्रेरित होतात आणि त्यांच्या अभिव्यक्तीला चालना मिळेल .
वर्गसजावटीमध्ये केवळ तोरणे न लावता,प्रत्यक्ष हाताळता येईल अशी सजावट.जसे,बोलकी    फरशी(फरशीवरील रंगकाम व त्याला पुरक असे अध्ययन साहित्य).त्याकरिता वर्गात फ्लॅनल बोर्डची व्यवस्था असणं अनिवार्य आहे.  बोलक्या भिंती  यामध्ये अक्षरे,शब्द व इतर विद्यार्तीनिर्मित कृति दर्शविण्यासाठी भिंतीवर व्यवस्ता असावी.
अशाप्रकारे  विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान  त्याची शिकण्याची तयारी आणि अध्ययन अनुभव याचा योग्य समन्वय घडवून आणावा.आज आपण ज्यापद्धतीतून काम करतो ,त्याला वर्तनवादी शिक्षणपद्धती असे म्हणतात.पियाजेनी  उंदराला  कळ दाबल्यावर अनअन मिळण्याची  व्यवस्था केली.यातून उंदराला कळ दाबल्यावर अन्न मिळते आणि नंतर त्यादृष्टीने सवयीने झालेला वर्तनबदल होय.परंतु एखादे मूल
जेव्हा असं म्हणतं की, “येथे झुरळ मरले आहे बघ.’’ येथे ‘मरले’ हे क्रियापदाचे भूतकाळातील रूप आहे.मुलाच्या आसपासचे लोक हे रूप कधीही वापरत नाहीत.सर्वजण “झुरळ मेले’’ असेच रूप वापरतात.पण, त्या लहान मुलात मराठीचे व्याकरण आकार घेत आहे.कोणीही कधीही न वापरलेले क्रियापद जर मूल वापरत असेल तर त्याला ते कसं सुचलं ,याचे उत्तर  वर्तनवाद देवू शकत नाही. याचाच अर्थ मूल स्वत; ज्ञानरचना करत असते. यावरून याचा बोध होतो की, बक्षिस व शिक्षा या दोन्हीद्वारे सर्वच वर्तनबदल शक्य नाहीत. वर्तनवादी शिक्षणपद्धतीत मुलाला ‘कोरी पाटी’, ‘मातीचा गोळा’  असं म्हटलं जातं .पण हे योग्य नाही, कारण खरंच तस असतं तर  एकाच शिक्षकाकडून शिकणारी  सर्वच मुले सारख्याच वेगाने का शिकत नसावीत ?  ब-याचदा असं होतं की, शिक्षक  जसे सांगतील तसेच काम करतात, शिक्षक जे सांगतील तेवढेच करतात,जोडवर्ग,मोठेवर्ग ,विषयसंख्या व जोडीला एखादे अशैक्षणिक काम ,यामुळे वेळेत ‘पोर्शन’ संपवण्याची  ‘धडपड’ होत असते.पण मुलाला यातील काय समजले का याकडे पहाण्यास वेळच मिळत नाही.शाळांमध्ये बहुतेकवेळा व्याख्यानपद्धती,फलक लेखन, पाठांतर,सराव, गृहपाठ, या चाकोरीतून जाताना शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सोयीचे जाते. अशा शिक्षणप्रक्रियेअंती मुले खरंच शिकतात का? असा प्रश्न पडतो. आणि त्यांच्या न शिकण्यामागचा दोष  विद्यार्थ्याच्या क्षमतेचा,त्याच्या कौशल्याचा किंवा मग  शिक्षकाच्या कौशल्याचा आहे असं ठरवलं जातं. पण खरा दोष हा,शिकवणे या पूर्वापार चालत आलेल्या संकल्पनेचा दोष आहे.हे आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणून ‘शिकवणे’’ यावरील लक्ष काढून, ‘शिकणे’ यावर केंद्रीत केले पाहिजे. आणि म्हणून  ‘ज्ञानरचनावाद’ ही   शिकविण्याची नसून ‘शिकण्याची’ प्रक्रिया आहे हे अधोरेखीत होते.
ज्ञानरचनावादात मुलाच्या अनुभवाला, शिकण्याच्या प्रक्रियेत मध्यवर्ती स्थान आहे.समृद्ध अनुभवाखेरीज मुले ज्ञानाची रचना करूच शकत नाहीत. उदा  अनेकदा हाताने करून शिकणे प्रभावी ठरते. मुलांना १ ते ५ या अंकाची ओळख करून देताना एका रंगीत गोलावर १ ते ५ उलट सुलट मोजत चालणे,वर्गातील मुलामुलींना मोजणे,चित्र मोजणे,मोजून पुन्हा भरणे, किंवा काढणे, सांगेण तेवढ्याच काड्या काढणे, मणी चिंचोके, चेंडू ,वस्तू मोजणे,लहान गट ढिग, मोठा गट ढिग,क्रमाने अंक मांडणे अशा मनोरंजक मार्गाने अंकाचा परिचय देता येतो. याचप्रमाणे  मुले एकदम शब्दवाचन शिकतात,म्हणजे चित्र व शब्द वाचन असे ५-५ चे संच करून घेवून , एक संच ३-४ दिवस  असे गटात चित्रशब्दवाचन  याप्रमाणे   ४ संच असे ३०एक संच वाचून घेवून त्यानंतर  चित्र व शब्द जोडण्यास दिल्यास मुले गटामध्ये स्वयंअध्ययनाने थेट शब्दवाचन शिकतात आणि गटात चुकणार्याची   इतर मुले चूक  दुरूस्त करतात,  अशा कृतींमध्ये  मुले न थकता सहभागी होतात. यावरून  असे सिद्ध होतं की,प्रत्येक मुलाची ज्ञानरचनेची कुवत वेगवेगळी असते.त्यामुळे याच्या  तात्विक  मांडणीविषयी ,शिवाय प्रायोगिकतेविषयी  समजून घेतल्यास  शिक्षकांच्या वर्गातील आंतरक्रियेत नेमकेपणा येवून त्यातील लवचिकता टिकून राहते.
अजून एक महत्वाची बाब म्हणजे,मुलाच्या एखाद्या संकल्पनेच्या धारणा एकदम बनत नसून,त्या बनतात, मोडतात व पुन्हा नव्याने बनतात.त्यामुळे प्रत्येक मूल अपेक्षित वेगाने शिकणार नाही त्यासाठी शिक्षकाचा संयम येथे महत्वाचा ठरतो.  वरील चर्चेवरून असाही प्रश्न पडतो की,जर मूल स्वताच शिकते तर शिकवणार्यांचे काम काय मात्र हा ज्ञानरचनावादाचा अपमान होईल. कारण येथे मोठ्यांसोबतच्या आंतरक्रियेलाही अतीशय महत्व आहे. उदा. भाषा  हे महत्वाचे साधन बर्याच प्रमाणात मोठ्यांशा झालेल्या आंतरक्रियेतूच मिळते.म्हणून येथे शिक्षक शिकविण्यापेक्षा सुलभकाच्या भुमिकेतच असतात.
येथे साधारणपणे पहिली ते पाचवीच्या वर्गात भरपूर प्रमाणात शैक्षणिक साहित्य वापरणे अपेक्षित आहे,उदा.पहिली-दुसरीकरीता (भाषा)   विविध वस्तू व आजूबाजूच्या परिसरातील चित्रासहित वाचनकार्डे,अध्ययनकार्डे,धूळपाटी,खरपाटी,मुळाक्षरे(सचित्र व चित्ररहित) ,शब्दकार्ड,अज्क्षरकार्ड,शब्दपट्या,वाक्यपट्ट्या,स्वरचिन्हाधारीत शब्द, जोडशब्द,कविताफलक,इंग्रजी अक्षरे , मराठी इंग्रजी अक्षरे,मराठी इंग्रजी वाक्ये व इतर आनुषांगीक साहित्य.(ENGLISH)इंग्रजी  अक्षरे,मराठी इंग्रजी वाक्ये,singular-plural,verb form ,word hanger,related words,rhyming words,synonymous,antonymous,capital-small lettersA,B,C,.., word formation,(गणित)संख्याकार्ड,अंककार्ड,भौमितीक आकार,लहान-मोठा,उंच-ठेंगणा,लांब-आखूड(प्रतिमा) नाणि-नोटा,घड्याळ,चित्र स्टॅंप,बेरीज-वजाबाकी मॉडेल,मनी माळा,सर्व गणितीय चिन्हे,१ ते १००० पर्यंतच्या विद्यमान नोटा,दोन-तीन-चार- पाच-सहा-सात अंकी संख्याघरे, १ ते ९ अंक व प्रतिमा चिंचोके,दशक-शतक प्रतिकात्मक साहित्य व इतर आनुषांगिक साहित्य. तसेच कृती  करण्यासाटी आवश्यक फरशीवरील रंगकाम अशा काही प्रातिनिधीक उपक्रमांची यादी देता येईल. अशा  भरपूर कृतींचा  यात समावेश आहे.
                यासोबतच शाळातील पारंपारीक खडुफळा बाजुला ठेवून तंत्रस्नेही अध्यापनतंत्रांची गरज ओळखून त्यासाठी लागणारे साहित्य (कंम्प्यूटर,प्रोजेक्टर,LCD TV, व इतर) आज शाळांमध्ये असणं अनिवार्य आहे  शिवाय ते हाताळण्याचं   प्रशिक्षणही तितकच महत्वाचं आहे.यासाठी  खानापुरातील काही शिक्षक व मोजक्याच संघटना स्वेच्छेने काम करत आहेत.पण  या प्रयत्नांना जर राजाश्रय ,लोकाश्रय मिळाला तर तालुक्यातील शाळांना बर्याच प्रमाणात चांगले दिवस निश्चितच  येतील  .यासाठी  शाळांमधील सर्व शिक्षक,शाळा सुधारणा समितीतील सदस्य,लोकप्रतिनिधी व माज विद्यार्थी यांचे संयुक्त प्रयत्न यांला एक दिशा देवू शकतात.
त्यासाठी पारंपारिक वर्तनवादाला फाटा देवून ,ज्ञानरचनावाद समजून घेवून आपली शाळा प्रयोगशील बनविण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.कारण खानापूर तालुक्यातील काही शाळांमधून खासकरून दुर्गम भागांमध्ये तेथील शिक्षकांनी स्वेच्छेने यापद्धतीतून प्रयोग चालविले आहेत.आणि  त्यांचे त्या शाळांमधून उत्तम परिणामही जाणवत आहेत . हे ‘प्रयोगशील शाळा अभियान’ सर्वदूर पोहोचवण्यासाठी आम्ही  सर्वांनी मिळून सर्व सरकारी शाळांना ‘उर्जितावस्था’ प्राप्त करून देण्यासाठी व  शिक्षणक्षेत्रात  होत  असलेलं बाजारीकरण थांबविण्यासाठी आपण आपल्या शाळा ‘अद्ययावत’ ठेवणं आणि पर्यायानं आपल्या शाळेचा पट आबाधीत ठेवण्यासाठी शाळांमध्ये कालानुरुप बदल करून आपल्या समोर असणार्या मुलांना ‘गुणवत्तापूर्ण शिक्षणा’चा हक्क मिळवून देण्यासाठी व स्पर्धेच्या युगात ‘सरकारी शाळांची प्रतिष्ठा’ टिकवून ठेवण्यासाठी आता प्रयोगशील बनण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.त्यासाठी आता सर्वप्रथम शिक्षकांनी स्वतःला अद्ययावत ठेवू याकडे सकारात्मकतेने बघणं हाच एकमेव पर्याय आहे.अन्यथा " कुर्हाडीचा दांडा गोतास काळ"असे दिवस आपल्यावरही आल्याशिवाय रहाणार नाहीत.


गोविंद पाटील
समूह संपन्मूल व्यक्ती ( केंद्र बरगाव)
भ्रमणध्वनी-८९७०७४२३०५
-८१५२९१३५३६

No comments: